खरं सांगू का, मी स्वत:लाच फसवतोय..!

पाखरे परत येतील सांज टळून गेल्यावर,
मेघ दाटून येतील उन पोळून गेल्यावर,
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर,
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर...




होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर,
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर,
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर,
पुन्हा तु ही परत येशील मी दूर गेल्यावर...





झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर,
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर,
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर,
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर...




आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर,
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर,
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी,
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर...
Previous Post Next Post