भेटी आपल्या वाढू लागल्या.


तश्या भेटण्याच्या जागा वाढू लागल्या...

कधी मातीच्या गंधात न्हायलेली पायवाट...
कधी तुला हवा असायचा हिरवळीचा एकांत...
कधी फुललेला पाहून गुलमोहर... होऊन सडा तू बरसायचिस...
कधी नदी किनारी पाहण्यात प्रतिबिंब बूडून जायचीस...

मी मात्र प्रत्येक ठिकाणी तू यायची वाट पाहायचो...

आता त्या जागा सापडण कठीण गजबजलेल्या शहरात...
तुला अशी ठिकाण नकोशीच...
मी जुळवून घेतलं या व्यवहारी जगाशी स्वतःला...

तू मात्र अचानक नाहीशी झालीस... न सांगताच निघून गेलीस...

सापडशील तू गर्दीत या वेड्या आशेने सार शहर घातल पालथं ...
शोधताना तूला स्वतः हरवून गेलो याच गर्दीत...

स्वतःचा... अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी निघालो दूर शहरापासून ...
तुला हवी असणारी प्रत्येक ठिकाण आहेत जिवंत अजून
याची जाणीव झाली आल्यावर शहरापासून दूर ...
आता तू समोर यावी आणि हे सार दाखवावं तुला
अस वाटल अन्... अन् तितक्यात कुणीतरी हातात हात घेतला...

वळून पाहिलं तर तू समोर उभी... मला बोललीस...
‘तू आलास? किती वाट पाहायची रे तुझी?’

स्पर्शाने सुखाश्रुंच्या पायवाट पुन्हा नव्याने सुगंधली...
अन् गुलमोहराच्या सहवासात आमच प्रेम राहील बरसत निरंतर....
Previous Post Next Post