लांडगा आला रे आला

लांडगा आला रे आला

एका गावात मनोज नावाचा एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे.

त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत.

एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.'

लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला 'कशी गंमत केली.'

शेतकरी संतापले. पण करतात काय तसेच निघून गेले. दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्‍या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्‍यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा ‍दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले.

तिसर्‍या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला.

दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.

उपदेश ः थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.
Previous Post Next Post